नवीन कायदे मागं घेण्यास नकार… परंतु ‘या’ मागण्यांवर सरकारनं दर्शवली सहमती

नवी दिल्ली, ९ डिसेंबर २०२०: शेतकऱ्यांनी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदनंतर संध्याकाळी सरकारच्या प्रतिनिधींसोबत त्यांची बैठक झाली होती. यावेळी सरकारनं कायदे मागं घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार सुधारित प्रस्ताव पाठवत आहे. त्यानंतर शेतकरीही सिंघू बॉर्डरवरील आंदोलन स्थळी या प्रस्तावावर चर्चा करतील.

गेल्या चौदा दिवसापासून शेतकरी दिल्लीमध्ये नवीन कृषी कायद्या विरोधात आंदोलन करत आहेत. यामध्ये कृषी उत्पादने, व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा २०२०, हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा २०२० आणि जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा २०२० यांचं समावेश आहे.

तिन्ही कृषी कायदे मागं घ्या, हमी भावापेक्षा कमी दरानं खरेदी अपराध ठरवा, किमान हमी भावाचा कायदा करा, ३% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरु करा, सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा, कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करा, राज्यांच्या वैधानिक अधिकारांचा सन्मान करा अश्या मागण्या शेतकरी केंद्र सरकारकडं करत आहेत.

केंद्र सरकारच्या सुधारित प्रस्तावात काय काय?

शेतमालाचं किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) सुरुवातीप्रमाणेच राहील.
एमएसपी कायद्या अंतर्गत येणारे बाजार अधिक सशक्त करण्यास सरकार तयार आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील वाद उपविभागीय दंडाधिकारी कोर्टाऐवजी दिवाणी न्यायालयात सोडवले जावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. याचा सरकारनं सुधारित प्रस्तावात समावेश केला आहे.

ज्या व्यापाऱ्यांना खासगी बाजारपेठात व्यापार करण्याची परवानगी मिळंल, त्यांची नोंदणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. सद्यस्थितीत केवळ पॅनकार्ड असणं अनिवार्य होतं. आता व्यापाऱ्यांची नोंदणी बंधनकारक करण्याचाही प्रस्ताव आहे.
पेंढा (हरियाणवी भाषेत पराली) या मुद्द्यावरही सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्यास तयार आहे. पेंढा जाळण्याचा पर्याय शेतकऱ्यांसाठी सोयीचा आहे, तर सुप्रीम कोर्टानं पर्यावरणाच्या मुद्द्यावर पराली जाळण्यास मनाई केली आहे.

विजेच्या मुद्यावरही सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार आहे.
याशिवाय कोणत्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना चर्चा करायची असल्यास ती ऐकून घेण्याची तयारी सरकारनं दर्शवली आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव हन्ना मुल्ला यांनी लेखी मसुद्यावर चर्चेची तयारी दर्शवली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा