राज्यपाल पदावरून मुक्त करा; राज्यपाल कोश्यारींनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली इच्छा

मुंबई, २३ जानेवारी २०२३ :राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असताना, राज्यपाल कोश्यारींनी ही विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले राज्यपाल ?

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात आवाज उठवला होता तसेच राज्यपालांना तातडीने पदावरून दूर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.

त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा