क्रांती दिन विशेष

आज ९ ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चले जाव चा इशारा दिला. या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीयांनी ‘करेंगे या मरेंगे’ अशी निर्वाणीची भूमिका घेऊन, इंग्रजांना छोडो हिंदुस्थान हा अखेरचा इशारा दिला होता. तोपर्यंत शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा ९ ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. इतकी स्पष्ट आणि कडक भूमिका घेऊनही, इंग्रजांनी आणखी पाच वर्षे आपल्याला स्वातंत्र्य दिलेच नाही, हेही महत्त्वाचे आहे. ९ ऑगस्ट १९४२ ते १५ ऑगस्ट १९४७ हा कालावधी प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायलाच हवा, इतका ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे.

१९४२ च्या जुलैमध्ये ‘छोडो हिंदुस्थान’चा इशारा, नव्हे, आदेशच इंग्रजांना देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. काँग्रेसच्या त्या प्रस्तावात, हिंदुस्थानातली ब्रिटिश राजवट ताबडतोब संपुष्टात आली पाहिजे, हिंदुस्थान स्वतंत्र होणे हे केवळ त्याच्याच हिताचे नसून यांच्या जगाचे हित त्यात सामावलेले आहे. हुकूमशाही, साम्राज्यशाही, लष्करशाही आदी अनिष्ट प्रवृत्ती यशस्वी मुकाबला करण्यासाठी हिंदुस्थान स्वतंत्र होणे आवश्यक आहे. असे म्हटले होते. त्यावेळचे काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना आझाद यांनी ७ ऑगस्ट १९४२ ला या प्रस्तावाच्या काँग्रेस महासमितीच्या मंजुरीसाठी मुंबईला अधिवेशन बोलावले होते. कार्यसमितीच्या प्रस्तावाला महासमितीनेही प्रचंड बहुमताने पाठिंबा दर्शविला होता.

महात्मा गांधींच्या नेतृत्वात इंग्रज सरकारविरुद्ध फार मोठ्या प्रमाणावर देशभर अहिंसक जनआंदोलन लवकरच उभे राहील, अशा शब्दांत महासमितीने आपला निर्धार व्यक्त केला होता. इंग्रज सरकारला स्वातंत्र्यवीरांच्या या ‘चले जाओ’ ठराव वजा आदेशात १८५७ च्या सशस्त्र बंडांची बीजे दिसली होती. त्यामुळेच महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल अशा ज्येष्ठ नेत्यांना ९ ऑगस्टच्या पहाटेच इंग्रज सरकारने अटक करून अज्ञातस्थळी रवाना केले होते.

काँग्रेस महासमिती सदस्य सकाळी ९ वाजता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजासाठी गोवालिया टँक मैदान या अधिवेशनस्थळी जमले. तेव्हा त्यांना प्रमुख नेत्यांच्या अटकेची बातमी कळली. सरकारच्या या अटकसत्रामुळे संपूर्ण देशातच संतापाची लाट उसळली. नेते नजरेआड झाले तरी आपण ‘चले जाव’ आंदोलन चालू ठेवू, असा निर्धार जागोजागी जाणवू लागला. ब्रिटिश साम्राज्यशाहीचा उरलासुरला धाकही जनतेच्या या निर्धाराने निपटून काढला.

लढाई जनाजनांची महात्मा गांधींसारख्या लोकोत्तर विभूतीने आपल्या देशबांधवांना ‘करेंगे या मरेंगे’ या निग्रहाने चले जाव अभियान चालवण्याचा संदेश दिला होता. पण, प्रत्यक्षात कोणती पावले उचलायची, हे अभियान नेमके कसे चालवायचे, यासंबंधी काहीच सांगितलेले नव्हते. इंग्रज सरकारने गांधीजींसारख्या नेतृत्व करणाऱ्या साऱ्याच प्रमुखांना काही सांगण्यापूर्वी, दिशानिर्देश देण्याची संधीही न देता स्थानबद्ध करून टाकले होते. त्यापूर्वी गांधीजी या चळवळीबद्दल आपल्या सहकाऱ्यांशी बोलले नव्हते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा