गोल पोस्ट राजकारण आमदार अपात्रतेचा निर्णय नरहरी झिरवळच घेऊ शकतात, विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, संजय...

आमदार अपात्रतेचा निर्णय नरहरी झिरवळच घेऊ शकतात, विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत यांचे वक्तव्य

मुंबई,दि,१० मे २०२३ -: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. या देशातील राजकीय अनागोंदी रोखण्याची ताकद न्यायालयात आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असे आम्हाला आजही वाटत आहे असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले. नरहरी झिरवळ यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला होता. त्यांना निर्णय घेऊ द्या. त्यांच्याकडेच हे प्रकरण गेले पाहिजे. त्यांचा निर्णय दुसरा अध्यक्ष फिरवू शकत नाही. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा. असे अवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना केले.

राज्यातील आमदार अपात्रतेचे प्रकरण माझ्याच हातात येईल, असे विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले होते. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी थेट नार्वेकर यांचाच राजीनामा मागितला आहे. राहुल नार्वेकर यांची कायद्या मंत्र्यासोबत बैठक झाली होती. कायदा मंत्र्याने बंद दरवाजाआडच्या बैठकीत काय होणार हे सांगितले का? तुमच्याकडेच प्रकरण येईल हे तुम्हाला कसे माहीत? ही कोणती दादागिरी आहे? कायदा मंत्री तीन तास बंद दाराआड चर्चा करतात हे काय चाललंय? असे अनेक प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले.

कर्नाटक विधानसभेचा निकाल राजकारणाला कलाटणी देणारा असेल. कर्नाटक हे दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य आहे. दक्षिणेतील कर्नाटक हे एकमेव राज्य भाजपकडे आहे. ते सुद्धा राहणार नाही. मोदी आणि शाह यांच्यापासून संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपचे नेते आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री कर्नाटकात ठाण मांडून बसले होते. पैशाचा महापूर झाला, बजरंग बलीलाही निवडणुकीत उतरवले परंतु यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंगबलीच त्यांच्या डोक्यात गदा मारणार आहे. हनुमानाची गदा यांच्या डोक्यात पडणार असा हल्ला भाजप वर राऊत यांनी चढवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version