सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू, नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश

14

मुंबई, 20 जानेवारी 2022: तिसऱ्या लाटेच्या संभावनेमुळं राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आली होती. संसर्गाचा जोर कमी होताना तर दिसतोय पण अजूनही धोका टळलेला नाही. अशा अवस्थेत राज्यातल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात कोविडचा प्रादूर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.

राज्यातील शाळा सुरू होत आहेत मात्र, सुरू करताना विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राथमिकता असून कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचं सर्वांनी काटेकोर पालन करावं, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. त्यानुसार येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत सर्व जिल्ह्यांमधील परिस्थितीचा शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी काल दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, विकास गरड यांच्यासह सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिकांमधील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शाळा सुरू करण्याबरोबरच वर्षा गायकवाड यांनी त्यासंबंधीचे निर्देश देखील दिले आहेत. शाळा सुरू होत आहेत पण, सुरू करताना स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊनच योग्य तो निर्णय घेण्यात यावा असा निर्देश देण्यात आलाय. त्यानुसार ज्या ठिकाणी कोविडच्या रूग्णांचा दर अधिक असेल तेथे जिल्हा प्रशासनासमवेत चर्चा करून निर्णय घेण्यात यावेत. शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं संपूर्ण लसीकरण होणं अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण लवकरात लवकर होण्यासाठी शाळांनी जिल्हा प्रशासनासोबत प्रयत्न करावेत. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

वर्षा गायकवाड यांनी यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी, महानगरपालिकांचे संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधून प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती आणि शाळा सुरू करण्याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. श्री.सोळंकी यांनी सर्व जिल्ह्यांतील शाळा आणि उपस्थित विद्यार्थ्यांबाबतची माहिती वेळोवेळी शासनास कळविण्याचे निर्देश विभागीय उपसंचालकांना दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा