राजीनामानाट्याने शरद पवारांची पकड मजबूत

मुंबई, ६ मे २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले चार दिवस शरद पवारांच्या राजीनाम्याने सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर शुक्रवारी पडदा पडला. त्यांनी ही खेळी खेळून वयाच्या ८३ व्या वर्षी पक्षावरील आपला दबदबा बळकट केल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या या खेळीमागे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या नेत्यांचा परस्पर बंदोबस्त झाला आहे. तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही पवारांची प्रतिमा उजळून निघाली आहे.

गेले काही दिवस अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटणार आणि भाजपला जाऊन मिळणार अशी जोरदार चर्चा होती. त्याला सत्ताधारी पक्षच नाहीतर विरोधी पक्षातील संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदारही दुजोरा देत होते. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघा पक्ष त्यांच्या मागे उभा होता. त्यामुळे आता बंडखोरी करणाऱ्यांना दहादा विचार करावा लागणार आहे.

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना राहुल गांधी, नितीश कुमार यांच्यासह देशभरातील समविचारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी फोन करून भाजप विरोधी आघाडीसाठी तुम्ही सक्रीय असणं आवश्यक असल्याची विनंती केली. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार नसतील तर भाजप विरोधी आघाडी कमकुवत ठरेल, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा