मुंबई, ठाणे, पुण्याच्या नातेवाईकांना आसरा , घरमालकांवरच गुन्हा दाखल

बारामती, दि.२८ एप्रिल २०२०: राज्यात शहरी भागातील कोरोना विषाणू संसर्ग फैलावामुळे नातेवाईक नागरिकांना आपल्या घरात आश्रय दिल्याचा प्रकार अंथुर्णे ( ता. इंदापुर )येथे उघड झाला आहे. येथील चार घर मालकांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मुबंई, ठाणे व पुणे येथे कोरोनाचा फैलाव जास्त वाढल्याने ग्रामीण भागातील अंथुर्णे येथे सुमारे ११ नागरीक व नातेवाईकांनी आसरा घेतला. यासाठी घरमालकांनी त्यांना सहकार्य केले. मात्र, वालचंदनगर पोलिस ठाण्यात बाहेरुन आलेल्या नागरीकांऐवजी थेट घर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे घरमालक अडचणीत आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतेही सहकार्य न करता हयगय करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच महाराष्ट्र शासन सार्वजनीक आरोग्य विभाग यांचेकडील अधिसूचीनुसार कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा बसण्यासाठी सार्वजनीक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. मास्क न वापरता तसेच आलेल्या लोकांना घरामध्ये संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव होईल. हे माहीत असतानाही त्यांना आपल्या घरामध्ये अश्रय दिला. त्यामुळे सिताराम कोंडीबा शिंदे, बापू विठ्ठल गायकवाड, संजय विठ्ठल जाधव, नारायण विठ्ठल जाधव (सर्व रा. अंथुर्णे ता.इंदापुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद ग्रामसेवक दिपक भोसले यांनी दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रकाश माने हे करीत आहेत .

मुंबई, ठाणे, पुणे येथून अनेक नागरीक ग्रामीण भागात गैरमार्गाने येत आहेत.त्यांनी गावपातळीवर आपत्ती निवारण समितीला माहिती देवून क्वारंटाईन झाले पाहिजे, माहिती लपवून ठेवल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे                            – दिलीप पवार
सहायक पोलिस निरीक्षक ,वालचंदनगर

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा