औरंगाबाद येथे बहीण, भावाची गळा चिरून हत्या; कारण अद्याप अस्पष्ट

औरंगाबाद, दि.१० जून २०२० : औरंगाबाद येथे बहीण-भावाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना एमआयटीसमोरील एका बंगल्यात मंगळवारी (दि.९) रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली आहे. या मध्ये मुलांचे आई वडील घरी आल्यानंतर या बहीण भावांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. शिवाय हे मृतदेह बाथरूममध्ये आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयटीसमोरील अल्फाईन हॉस्पिटलच्या पाठीमागे दोन मजली बंगल्यात लालचंद खंदाडे (राजपूत) हे भाड्याने राहत होते. शेतीच्या कामानिमित्त ते जालना येथे गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी व मुलगी हेही गेले होते. त्यामुळे घरात त्यांची मोठी मुलगी किरण (१८) आणि तिचा भाऊ सौरभ (१६) हे दोघेच होते. रात्री आठच्या सुमारास लालचंद राजपूत घरी परतले. त्यांनी वाहनाचा हार्न वाजविला, परंतु घरातून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी वाहन उभे करून पाहणी केली असता बाथरूममध्ये बहीण-भावाचे मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच उपायुक्त डॉ. राहुल खाडे, मिना मकवाना, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा