कोणी म्हणंल सिंधुदुर्ग किल्लाही मीच बांधला’; उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला

सिंधुदुर्ग, 10 ऑक्टोंबर 2021: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटन समारंभात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली. हा कार्यक्रम राजकारण विरहीत असेल असं सर्वच नेत्यांनी ठरवलेलं असलं तरी देखील संपूर्ण महाराष्ट्राला राणे आणि ठाकरे यांचा राजकीय सामना पाहायला मिळाला.

बऱ्याच दिवसानंतर दोन्ही नेते व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही नेत्यांनी भाषणं देखील केली. यावेळी दोन्ही नेते काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर नारायण राणेंनी केलेल्या भाषणानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. “जे काही आधी बोलून गेले आहेत विकासाच्या गोष्टी त्या मी परत नाही सांगणार. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो, महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे … माझा समज असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्लातरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाही कोणतरी बोलेल मीच बांधला.” असंही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

मुख्यमंत्री भाषणात म्हणाले, “आजचा क्षण मला वाटतं आदळ आपट करण्याचा नाही. तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी मी तुमचं खास अभिनंदन करतोय. कारण तुम्ही इतकं लांब राहून देखील मराठी मातीचा संस्कार विसरला नाही. माती एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीचे असतात, काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू? जोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठ्या सौभाग्याचा दिवस आहे. कारण, शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. अनेकदा मी म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झालं ते शिवसेनाप्रमुख.”

तसेच, “कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी त्या विषयावर बोलायचं तर खूप बोलता येईल, बोलेनही कदाचित पण आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं महाराष्ट्राचे वैभव ही जी संपन्नता आहे. ती आज आपण जगासमोर नेतो आहोत. जगातनं अनेक पर्यटक आणि त्या सुविधांमधला सगळ्या मोठा भाग असतो तो, विमानतळांचा आणि त्या विमानतळाचं लोकार्पण आज झालेलं आहे.” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा