मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने इंदापूर तहसीलदारांना निवेदन

इंदापूर, दि. १३ जुलै २०२० : कोपर्डीच्या ताईला तात्काळ न्याय मिळावा, मराठा समाजाच्या विविध मागण्या शासनाने मान्य कराव्यात, या आशयाचे निवेदन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना सोमवारी (दि.१३) देण्यात आले.सदरचे निवेदन पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, ऋतुजा नायकुडे, निकिता पवळ, प्रतिभा करपे तसेच जयंत नायकुडे, प्रा. कृष्णा ताटे, पवन घोगरे, प्रवीण पवार, राम आसबे, सचिन सावंत, प्रेमकुमार जगताप,भारत जामदार आदींनी तहसिदारांना दिले.

कोपर्डीच्या भगिनीचा दि.१३ जुलै रोजीचा स्मृती दिन राज्यभर मराठा समाज हा काळा दिवस म्हणून पाळत आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाज हा आपल्या कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून शांततेच्या मार्गाने प्रयत्न करीत आहे, परंतु आजही कोपर्डीच्या ताईस न्याय मिळू शकला नाही. त्या आरोपींना तात्काळ न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे, यासाठी सरकार गंभीर दिसत नाही. मराठा समाज रेकॉर्ड ब्रेक संख्येने न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरला, परंतू कोपर्डीच्या भगिनीला जनतेने निवडून दिलेले सरकार न्याय देत नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. यावर्षी आम्ही राज्यसरकारला जागे करण्यासाठी राज्यातील मराठा समाज शांततेच्या मार्गाने निषेध करीत आहे व कोपर्डीच्या नराधमांना एक महिन्याच्या आत फाशी द्यावी,अशी आमची मागणी आहे, यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आहे.

तसेच मराठा आरक्षण कायम राहावे यासाठी सरकारने आपली बाजू न्यायालयामध्ये ताकदीने मांडली पाहिजे. यासाठी अभ्यास असणारे कायदेतज्ज्ञ नेमावेत. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील गरीब आणि होतकरू युवकांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत यासाठी कायदा करावा व कर्ज द्यावे.

राज्यातील प्रत्येक जिल्यात सरकारी वसतिगृह मराठा समाजातील युवकांसाठी निर्माण करावे. सारथी संस्थेमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्याचा चौकशी अहवाल तत्काळ आणावा व संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत. सारथी बाबत आठ कोटी रूपये ची बोळवण न करता पाचशे कोटी रूपये देण्यात यावेत. मराठा आंदोलनातील शहिद कुटुंबियांच्या घरातील एका व्यक्तीस एस.टी.महामंडळात सामावून घेणे व प्रत्येक कुटंबाला ५० लाख रूपया पर्यंत मदत जाहीर करावी.

राज्यात मराठा आरक्षण चळवळीच्या काळात मराठा युवकावरील खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत या बाबत ज्या युवकावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या युवकाची बाजू मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी एकदा ऐकून घेण्यात यावी. मराठा समाजातीत १३५०० हुन जास्त युवकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत याबाबत सर्व गुन्हांची पुन्हा चौकशी करण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामास सरकारने येत्या दोन महिन्यात सुरवात करावी व याबाबत कामाचा अहवाल दर आठ दिवसांनी जनतेला देण्यात यावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.दरम्यान, निवेदनातील सर्व मागण्या शासनाकडे पाठविण्यात येतील, असे तहसीलदार तहसीलदार सोनाली मेटकरी यांना यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा