खोटी माहिती देऊन सावत्र मुलाने आईलाच ठरवले मृत, स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेवून आई पोहचली पंचायत समितीत

छत्रपती संभाजीनगर, ५ जुलै २०२३ : शेत जमिनीच्या हव्यासापोटी सावत्र मुलाने आपल्या जिवंत असलेल्या आईला ग्रामपंचायतीच्या कागदोपत्री मृत दाखविल्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यातील आघूर येथे उघडकीस आला आहे. यानंतर ही महिला स्वतःचे मृत्यू प्रमाण पत्राचा घेवूनच पंचायत समितीत दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे तीन एकर शेतजमीन हडपण्याचा डाव मुलाने रचला असल्याचा आरोपही महिलेने केला आहे. तर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने कोणतीही खातरजमा न करता हे प्रमाणपत्र कसे दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील आघूर येथील मंगलबाई उत्तमसिंग राजपूत या आपल्या मुलीच्या घरी रांजणगाव येथे राहतात. आघूर शिवारात त्यांची शेतजमीन आहे. ही शेतजमीन हडपण्याच्या उद्देशाने त्यांचा दीर शंकरसिंह रतनसिंह राजपूत, त्यांची दोन मुले आणि महिलेचा सावत्र मुलगा पंकज राजपूत यांनी ग्रामपंचायतला खोटी माहिती देऊन त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र तयार केले. पंकज राजपूत, दीपक राजपूत, शंकरसिंग राजपूत, सागर सोळुंके या सर्वांनी मिळून खोटी माहिती देऊन ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र मिळावले. हे प्रमाणपत्र तलाठी कार्यालयात दाखल करून आपली जमीन नावावर करण्याचा त्यांचा डाव असल्याचे या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या दरम्यान,आघूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने एका छापील नमुन्यात मृत्यू प्रमाणपत्राचा दाखला दिला आहे. यात मृत व्यक्ती मंगलबाई उत्तमसिंग राजपूत असा उल्लेख आहे. जिवंत असलेल्या महिलेचा मृत्यू १५ मे २०२३ रोजी झाल्याचे दाखवून नोंदणी केली गेली आहे. या नोंदणीचा क्रमांक ७१/२०२३ दाखविण्यात आला आहे. हे प्रमाणपत्र २१ जून २०२३ रोजी दिल्याची तारीख असून, त्यावर ग्रामपंचायतीचा शिक्का आणि ग्रामसेवकाची स्वाक्षरी आहे.

या मृत्युपत्रातील वस्तूस्थिती पाहता, मृत्यू प्रमाणपत्रावर गंभीर स्वरूपातील चुका दिसून आल्याने त्याच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित होत आहे. महिलेचा मृत्यू १२ मे २०२३ रोजी म्हंटले असताना नोंदणी मात्र मागील वर्षी १७ मे २०२२ रोजी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र ग्रामसेवकानेच दिले का?, अन्य कोणी शिक्क्यांचा गैरवापर करून हे तयार केला याचे कोडे निर्माण झाले आहे. दरम्यान जिवंत महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र कोणत्या आधारे देण्यात आले? याबाबत आपला वस्तुनिष्ठ अहवाल दोन दिवसांत देण्याचे आदेश ग्रामसेवकांना पंचायत समिती प्रशासनाने दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा