मुंबई-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; दहा ते बारा वाहने एकमेकांवर आदळली

धायरी, १४ फेब्रुवारी २०२३ : भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने वडगाव बुद्रुक येथील पुलाजवळ विचित्र अपघात घडला आहे. यामध्ये १० ते १२ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेली आधिक माहिती अशी, की कोल्हापुरहून अहमदाबादकडे कपडे घेऊन निघालेला ट्रक वडगाव बुद्रुक येथील पुलावरून उताराने खाली येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान, सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी होती. या अपघातात १० ते १२ चारचाकी वाहने एकमेकांवर आदळल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे.

ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचेही या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पवार, पोलिस उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा