बांधावरील प्रयोगशाळा ही संकल्पना वाशिम जिल्ह्यात राबविण्यात आली, शेतकऱ्यांचा कल विषमुक्त शेतीकडे

वाशिम, ३१ जुलै २०२३ : शेती उत्पादन घेताना केलेल्या रासायनिक खतांच्या भडीमारामुळे शेतीचा पोत खालावतो. त्याचबरोबर रासायनिक खतांच्या वापरातून पिकवलेल्या अन्नधान्याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्यासाठी विषमुक्त शेती संकल्पना समाजात प्रचलित होणे गरजेचे आहे. सेंद्रीय शेतीकडे वळणे ही आता काळाची गरज झाली आहे. नेमकी हीच बाब ओळखून वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील शेतकऱ्याने पुढाकार घेतला. शेतकरी भागवत ढोबळे यांनी शेतात बांधावर जैविक प्रयोगशाळा उभारली. गावाबरोबरच परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्यात त्यांना यश आले. डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला अंतर्गत स्थापित, योगायोग जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी आणि मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत शेत बांधावरील प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत सुरू केलेल्या या प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावातच जैविक निविष्ठा उपलब्ध होत आहे.

कृषी क्षेत्रातील या अभिनव प्रयोगामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल विषमुक्त शेतीकडे वाढण्यास चालना मिळणार आहे. शेतीत विविध पिकांचे उत्पादन घेत असताना कराव्या लागणाऱ्या अवाढव्य उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक गणिताचा ताळमेळ बसत नाही. शेतकऱ्यांचे अर्थचक्र सुधारून कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त नफा त्यांना मिळावा, याकरिता वाशिम जिल्ह्यात फार्म लॅब अर्थात बांधावरील प्रयोगशाळा ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात जैविक निविष्ठांची निर्मिती करण्यात येत आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांकडून संचालित होत असलेल्या २० प्रयोगशाळा जिल्ह्यात कार्यरत आहेत. यामधून निर्माण होत असलेल्या निविष्ठांचा उपयोग शेतकरी करत आहेत.दिवसेंदिवस वाढत्या उत्पादन खर्चाने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या सततच्या वापराचे प्रतिकूल परिणाम शेतजमिनीच्या उत्पादकतेवर होत आहे. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून फार्म लॅब अर्थात शेतीच्या बांधावरील प्रयोगशाळा ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे.

कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात सर्वप्रथम प्रयोगशील शेतकऱ्यांच्या गटांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.याच तज्ज्ञ संचालकांच्यामार्फत या प्रयोगशाळांचे कामकाज चालविण्यात येत आहे.या प्रयोगशाळांच्या माध्यमातून विविध जिवाणू खते, जैविक किटकनाशके, ट्रायकोडर्मा, बियाण्यास बीज प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त असलेले रायझोबियम यासारख्या निविष्ठांची निर्मित करण्यात येते. घरगुती पध्दतीने तयार होणाऱ्या या दर्जेदार निविष्ठांचा खर्च बाजारात मिळणाऱ्या निविष्ठांच्या तुलनेत फारच कमी आहे. या जैविक निविष्ठांच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होण्यास मदत होत आहे. या अभिनव प्रयोगामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढीस हातभार लागला आहे.

नकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा