राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा आज होणार फैसला

पुणे, २० डिसेंबर २०२२ : राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज मंगळवारी (ता.२०) जाहीर होत आहेत. रविवारी या निवडणुकीसाठी सुमारे ७४ टक्के मतदान झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपद, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे रविवारी प्रत्यक्षात ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. आता आज जाहीर होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे :
ठाणे १३५, पालघर ६२, रायगड १९१, रत्नागिरी १६३, सिंधुदुर्ग २९१, नाशिक १८८, धुळे ११८, जळगाव १२२, अहमदनगर १९५, नंदुरबार ११७, पुणे १७६, सोलापूर १६९, सातारा २५९, सांगली ४१६, कोल्हापूर ४२९, औरंगाबाद २०८, बीड ६७१, नांदेड १६०, उस्मानाबाद १६५, परभणी ११९, जालना २५४, लातूर ३३८, हिंगोली ६१, अमरावती २५२, अकोला २६५, यवतमाळ ९३, बुलडाणा २६१, वाशीम २८०, नागपूर २३४, वर्धा १११, चंद्रपूर ५८, भंडारा ३०४, गोंदिया ३४५, गडचिरोली २५. एकूण ७ हजार १३५.

ग्रामपंचायतींसाठी चुरशीने झालेल्या मतदानानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. चौकाचौकांत गप्पा रंगू लागल्या आहेत. मंगळवारी (ता.२०) गुलाल कुणाला, याचा फैसला होत आहे. सकाळी १० वाजेपासूनच निकाल हाथी यायला सुरवात झाली आहे.

धाकधूक अन्…
बहुतांशी गावांमध्ये अत्यंत अटीतटीने निवडणूक पार पडली. सत्ताधारी आणि विरोधकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत; तरीही दुपारपर्यंत अनपेक्षित निकालाचीही धाकधूक आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच मतमोजणीकडे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदानानंतर अनेक उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरणार की अपेक्षाभंग होणार, हे प्रत्यक्ष निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा