शालेय व्यवस्थापनाची घसरण हा शैक्षणिक परंपरेचा अपमान आहे’, शरद पवार यांनी सरकारला लिहिले पत्र

पुणे, १४ जुलै २०२३: गेल्या आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स २.० म्हणजेच पीजीआय जारी केला. या प्रसिद्ध अहवालात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर आला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. शालेय व्यवस्थापनाचा दर्जा घसरणे हा शैक्षणिक परंपरेचा अपमान असल्याचे शरद पवार यांनी चिंता व्यक्त करत म्हटले आहे.

वास्तविक महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा घसरल्याचे या पीजीआय अहवालातून समोर आले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. पीजीआयचे मूल्यमापन ज्या पॅरामीटर्सवर केले जाते त्यात आम्ही मागे पडलो आहोत. ‘पीजीआय’मध्ये महाराष्ट्र मागे पडला आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. राज्यातील ३८ हजार शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटली आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. इतकेच नव्हे तर राज्य सरकारने लवकरच संबंधित पक्षांची बैठक बोलावून आवश्यक ती पावले उचलावीत, असेही शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

कार्यक्षम शिक्षण पद्धतीमुळे समाज सुधारतो. महाराष्ट्रात, अनेक शिक्षणतज्ञांनी हे तत्त्व ओळखले आणि एक कार्यक्षम शाळा व्यवस्था निर्माण करण्यास प्राधान्य दिले. मात्र, आज राज्यातील शाळा व्यवस्थापनाच्या गुणवत्तेतील घसरण ही महाराष्ट्राच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेसाठी लाजिरवाणी बाब आहे.

यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत राज्य म्हणून आपण खूप मागे पडलो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यशवंतराव चव्हाण केंद्राने गेल्या वर्षी ‘दोन शिक्षक शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर एक दिवसीय परिषद आयोजित करून काही निरीक्षणे नोंदवली होती. यासोबतच बदलत्या शैक्षणिक धोरणांचा विचार करून काही सूचनाही करण्यात आल्या. राज्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ३८ हजार शाळा आहेत. कमी विद्यार्थी संख्येमुळे बऱ्याच शाळा बंद केल्याची चर्चा वेळोवेळी होत असल्याने, सरकारने याचा गांभीर्याने विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यामुळे घसरलेला शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने आणि विशेषतः शालेय शिक्षणमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. याबाबत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेऊन आवश्यक कृती कार्यक्रम तयार करावा. शिक्षणाचा दर्जा समोर आणण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा