मुंबई, 7 नोव्हेंबर 2021: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण समिर वानखडे यांच्यावरच पलटताना दिसत आहे. आर्यनवर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये आणि त्याला अटक केली जाऊ नये म्हणून 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. असा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला. या आरोपांची एनसीबीचं दिल्लीतील विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी करत असून हे पथक सोमवारी पुन्हा एकदा मुंबईत येत आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने खंडणीबाबत दावा केला आहे. आर्यनवर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये आणि त्याला अटक केली जाऊ नये म्हणून 25 कोटींची मागणी करण्यात आली होती, असा आरोप त्याने केला होता. इतकेच नाही तर यामागे किरण गोसावी आणि सॅम डिसूझा होते. या डीलमधील 8 कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मिळणार होते, असा धक्कादायक दावा साईल याने प्रतिज्ञापत्रावर केला आहे.
या प्रतिज्ञापत्राची गंभीर दखल घेत एनसीबी महासंचालकांनी चौकशीसाठी दिल्लीतील अधिकाऱ्यांची एसआयटी नेमली आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह हे एसआयटीचे प्रमुख आहेत. एसआयटीने याआधी मुंबईत येऊन सलग तीन दिवस तपास केलेला आहे. त्यात समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली आहे तसेच काही कागदपत्रेही ताब्यात घेतली गेली आहेत. प्रभाकर साईल यालाही जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्याच्यापर्यंत समन्स पोहचला नाही. तो या चौकशीपासून दूरच राहिला. त्यानंतर हे अधिकारी दिल्लीला परतले होते.
आता यानंतर पुन्हा एकदा दिल्लीतील अधिकारी मुंबईला येणार आहेत. यावेळी ते ज्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता त्या क्रूझवर जाऊन तपास करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथून हे क्रूझ गोव्याला निघाले होते. त्यामुळे या टर्मिनलवरही तपास केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. येथूनच आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे











































