गोल पोस्ट राष्ट्रीय जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलेल; राज्यसभेत नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी

जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलेल; राज्यसभेत नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी

नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी २०२३ :संसदेत गदारोळ माजवणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘तुम्ही जितका चिखल फेकणार, तितके कमळ फुलणार’ असे म्हटले आहे. काही लोकांनी कमळ उमलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होत असतांना विरोधकांनी गदारोळ सुरू केला होता. नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होत असतांना विरोधकांनी ‘मोदी-अडाणी भाई-भाई’ अशा घोषणा देत अडाणीच्या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

मात्र, नरेंद्र मोदी यांनी गदारोळ सुरू असतांनाही आपले भाषण सुरूच ठेवत टोलेबाजी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी एवढ्या मोठ्या सभागृहातील भाषणावर देशातील प्रत्येकाचे लक्ष असते. त्यामुळे निराशा होत आहे हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. यावेळी भाषणात नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, आम्ही संकटापासून पळून जाणारे लोक नाही. कधीकाळी ज्यांची ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत सत्ता होती त्यांनी देशासाठी काहीही काम केले नाही.

आज आमच्या सरकारने जगभरात ओळख केली आहे. ती देखील आमच्या कष्टाने केली आहे. असा टोला देखील नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला लगावला आहे. आम्ही कुठलीही समस्या कायम स्वरूपी सोडवत असतो असे मोदी म्हणाले आहे.

  • देश पाहत आहे, एकटाच…

भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंधळ घालणाऱ्या आणि घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी खासदारांची खिल्ली उडवली. विरोधी बाकाकडे पाहून ते छाती ठोकून म्हणाले की, आज देश पाहत आहे, एकच अनेकांवर किती भारी पडत आहे. मी देशासाठी जगतो, देशासाठी काहीतरी करण्यासाठी बाहेर पडलो आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version