तेंव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील, सरकार स्थापनेच्या टिकेवरून शरद पवार यांचा पलटवार

पुणे २६ जून २०२३: शरद पवार यांच्यावर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी आणि शरद पवार यांनी केली तर मुत्सद्देगिरी असे कसे चालेल? असा सवाल केला होता. फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. मी बेईमानी कधी केली? देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे? असा सवाल करतानाच मी स्थापन केलेले सरकार हे सर्वसमावेशक होते. त्यात जनसंघ म्हणजे आताचा भाजपही होता, कदाचित हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल, त्यांचे वाचन कमी असेल. फडणवीस तेंव्हा प्राथमिक शाळेत असतील, अशी जहरी टीका शरद पवार यांनी केली. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

१९७७ मध्ये आम्ही सरकार बनवले. त्यावेळचा जनसंघ म्हणजे आताचा भाजप माझ्यासोबत होता. उत्तमराव पाटील भाजपचे नेते होते. ते माझ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. फडणवीस लहान होते तेंव्हा. त्यामुळे त्यांना कळले नसेल. त्यांना पूर्वीचा इतिहास माहीत नसेल. मी जे सरकार बनवले ते सर्वांना घेऊन. त्या सरकारमध्ये जनसंघाचे हशू आडवाणी होते. आणखी काही सदस्य होते. फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे त्यांना त्याची माहिती नसेल. त्यामुळे अज्ञानापोटी ते असे स्टेटमेंट करतात. यापेक्षा वेगळे काही नाही, असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी केवळ ओबीसींना दाखवण्यापुरते पदे देते, असा आरोपही फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या आरोपातील हवाच पवार यांनी काढली. फडणवीस यांनी पुन्हा आपले अज्ञान दाखवले असुन राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. भुजबळ कोण आहेत? त्यानंतर मधुकर पिचड प्रदेशाध्यक्ष होते, ते कोण आहेत? त्यानंतर सुनील तटकरे अध्यक्ष झाले ते कोण आहेत? हे सर्व नेते ओबीसी आहेत. ही सर्व यादी पाहिली तर फडणवीस यांचे वाचन किती आहे माहीत नाही. पण ते या गोष्टींची नोंद न घेता विधान करत आहेत. त्यांनी जो प्रश्न विचारला तो वास्तवतेला धरून नाही, असेही पवार म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न हाती घेतलाय. संपूर्ण राज्याचा विचार केला तर कांदा हे पिक कुठे आहे? विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात कांदा पिक घेतले जात नाही. नाशिक, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रात कांदा पिक घेतले जाते. त्यांच्यासाठी हे पिक महत्त्वाचे आहे. काही लोकांनी इथून हैदराबादेत कांदा नेला. तिथे त्यांची काय फजिती झाली हे पाहा. राजकीय दृष्ट्या काही वेगळे करू शकतो हे दाखवण्याचा केसीआर यांचा प्रयत्न आहे. सेवा करत असेल तर स्वागत आहे, असं सांगतानाच केसीआर यांची महाराष्ट्रातील ताकद किती हे निवडणुकीनंतरच कळेल, असेही पवार म्हणाले.

विरोधी पक्षाचे १९ पंतप्रधान पाटण्यात भेटले होते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यावरून पवार यांनी बावनकुळे यांना फटकारले. असे वक्तव्य करणे पोरखेळपणा आहे. त्या बैठकीत पंतप्रधानपदावर चर्चा झाली नाही. महागाई, बेरोजगारी आणि धार्मिक तणावावर चर्चा झाली. राज्य आणि धर्म आणि यातून मतभेद वाढणे चिंताजनक आहे, त्याला आवर घालण्यासाठी चर्चा झाली. काही तथाकथित नेते बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अरे लोकशाहीत बैठक घेऊ शकत नाही का? बावनकुळे म्हणाले, बैठक कशाला घेतली? दुसऱ्या दिवशी मुंबईत त्यांच्या मित्र पक्षाची बैठक होणार असल्याचं बावकुळे यांनी सांगितलं. तुमच्या बैठका चालतात. आमच्या का नाही चालणार? असा सवाल त्यांनी केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय, त्यावर पवार म्हणाले हा निर्णय कोणी एकटा घेत नाही. पक्षातील प्रमुख नेते निर्णय घेतील. सर्वांनीच पक्षाच्या कामात भाग घ्यावा अशी सर्वांची भावना आहे. तेच मत अजित पवार यांनी व्यक्त केले, त्यापलिकडे त्यात काही नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा