मुंबई, ८ एप्रिल २०२३: भारताच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार यांनी अदानी समूहावर हिंडेनबर्ग रिपोर्टवरून संसदेत झालेल्या गतिरोधावर एका खाजगी वृत्तवाहिनीवर मुलाखतीदरम्यान आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार म्हणाले की, बड्या उद्योगपतींना लक्ष्य करण्याच्या शैलीशी ते सहमत नाहीत. सरकारवर टीका करायची असेल तर अंबानी, अदानी यांची नावे घेतली जातात. तुम्ही ज्यांना टार्गेट करत आहात त्यांनी काही चुकीचं केल असेल तर कारवाई झालीच पाहिजे.
पण आज सरकारवर हल्ला करायचा असेल तर अंबानी अदानी ही नावे पुढे आलीत. तुम्ही ज्या लोकांना लक्ष्य करत आहात, त्यांनी काही चूक केली असेल, अधिकारांचा गैरवापर केला असेल तर लोकशाहीत तुम्हाला त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा १०० टक्के अधिकार आहे. पण कोणतीही नीट माहिती न घेता हल्ला करणे समजण्यापलिकडे आहे. “आज पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानींनी योगदान दिले आहे, देशाला त्याची गरज नाही का? वीज क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. वीजेची आवश्यकता देशाला आहे की नाही? जर देशाच्या अर्थव्यवस्थेला लाभ होईल, अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांवर टीका करणे योग्य वाटत नाही. जबाबदारी स्वीकारून देशाचे नाव उंचावणारे हे लोक आहेत.
अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी देशातील विरोधी पक्षांकडून संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीची मागणी केली जात आहे. परंतु ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधातली असल्यामुळं त्यातून सत्य बाहेर येण्याबाबत शंका निर्माण होऊ शकते. उलट सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनं अदानी प्रकरणाची चौकशी केली तर त्यातून सत्य देशासमोर येईल. शरद पवारांनी सांगितले की, काही मुद्दे वैयक्तिक झाले आणि चांगले मुद्दे नजरअंदाजही केले गेले. सदनात कोणत्या मुदद्यावर चर्चा व्हायला पाहिजे, देशवासियांपुढे कोणत्या समस्या आहेत. कायदा सुव्यवस्था, महागाई, बेरोजगारी. असे मुद्दे नजरअंदाज करणे योग्य नाही. तसे होत असेल तर आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड