ठाणे जिल्ह्यातील तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

ठाणे, २६ ऑक्टोबर २०२२ : शिवसेनेत उठाव करत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले तेव्हापासून ठाणे हे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे केंद्र बनले आहे. आता ठाणे जिल्ह्यातील तीन आमदार भारतीय जनता पक्षात दाखल होण्याची चिन्हे आहेत. भाजपमध्ये दाखल होण्याच्या मार्गावर असलेले दोन आमदार कल्याण-डोंबिवलीतील, तर एक ठाण्यातील असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे जिल्हा राजकीय दृष्ट्या मोठा जिल्हा समजला जातो.येथे विधानसभेचे १८ आमदार, विधान परिषदेचे तीन आमदार आणि तीन खासदार आहेत. या जोरावरच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत उठाव करून राज्यात सत्तांतर घडवून आणले. परंतु आता ठाण्यात पुन्हा पक्षांतर्गत गटबाजी सक्रिय झाली असून त्यातून एकमेकांना शह देण्याचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे वेळीच आपले हितशत्रू ओळखून काही आमदारांनी पक्षांतर करण्याचा रस्ता निवडल्याचे बोलले जात आहे.

बदललेल्या राजकीय परिस्थितीमूळे महाविकास आघाडी आणि युतीच्या लढाईत आपल्यासाठी काय योग्य आहे. यासाठी या आमदारांनी चाचपणी सुरू केली आहे. पक्षांतर झाले तरच मंत्री पद मिळू शकते, हे जवळपास निश्चित मानले जात असल्याने पक्षांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या शिवसेनेच्या दोन गटातील भांडणामुळे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही कडील आमदारांसह नगरसेवकपदाचे इच्छुक उमेदवारही चिंतेत आहेत. दोन्ही शिवसेनांना स्वतंत्र चिन्हे मिळाली आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याची अधिक शक्यता आहे. अशी या आमदारांची धारणा झाल्यामुळे ते भाजपकडे वळल्याचे बोलले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा