मुंबई, २६ ऑगस्ट २०२० : राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं लॉकडाऊनच्या संकटकाळातही, जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करुन आणि महास्वयंम वेबपोर्टल मार्फत, ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे.
सदर विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी आज निवेदनाद्वारे ही माहिती दिली. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांची सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केलं आहे.
या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपलं शिक्षण, कौशल्यं, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात.
यापुढेही या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी, आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातले उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































