केंद्रातील सरकार ध्रुतराष्ट्र, मणिपूरच्या घटनेवरुन उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर घणाघात

मुंबई, ३० जुलै २०२३ : हिंदुत्वावरून उध्दव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला. हिंदुत्व काय आहे? फक्त मंदिरमध्ये जाणारा, घंटा बडवणारा हिंदू नको आहे. आम्हाला अतिरेक्यांना मारणारा हिंदू हवा आहे. आमच्या वज्रमूठ सभेला सर्व जातीधर्माचे लोक आले होते. या लोकांनी नकली हिंदूंना सभास्थळी जावून गोमूत्र शिंपडले. अरे माणसासारखी माणसे सभेला आली होती आणि त्यांना तुम्ही अपवित्र मानता? आमचे हिंदुत्व हे हृदयात राम आणि हातात काम असे आमचे हिंदुत्व आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधला. ठाण्यात गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मणिपूरच्या घटनेवरुन केंद्र सरकारला ध्रुतराष्ट्राची उपमा दिली.

माणसा-माणसामध्ये भेद करणाऱ्यांचा मुखवटा फाडून काढायचा आहे. मणिपूर जळत आहे. हेच आपले हिंदू राष्ट्र आहे? मी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा बोलायचे सुरु होते. ज्या हनुमानने सीतेसाठी लंका जाळली, सीता हरण झाले म्हणून रामायण घडले, द्रौपदीचे वस्त्रहरण झाले म्हणून महाभारत घडले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दु:खाची गोष्ट तर हीच आहे की, द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा तिथे ध्रुतराष्ट्र राजा म्हणुन बसले होते. त्यांना दृष्टी नव्हती. आजचे सरकार जे बसले आहे ते ध्रुतराष्ट्र आहे. आपल्याही देशात दोन महिलांसोबत जे केले ते व्हिडीओमुळे समोर आले. तिथले मुख्यमंत्री म्हणत आहेत की, अशा घटना भरपूर घडल्या आहेत. अरे लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

देशात राष्ट्रपती महिला आहेत, काय करत आहेत? मी महामहीम राष्ट्रपतींना विचारु इच्छितो, राष्ट्रपती महोदया तुम्ही ज्या राष्ट्रपती आहेत त्या देशातील महिलांची अब्रू भर रस्त्यावर लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत का? तिथल्या राज्यपाल महिला आहेत. त्या काहीच करत नाहीत. आमच्या येथे जे राज्यपाल होते ते कशी मस्ती करत होते. त्यांना पाठवा तिथे. मंदिर उघडा ते उघडा. कोरोना संकट एवढे सोपे होते का? असे राज्यपाल तिकडे का पाठत नाहीत?, असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले.

मी विरोधी पक्षांची एकजूट मानत नाही तर ज्या सर्व पक्षांची एकजूट झालीय तिचं नाव इंडिया आहे. पण इंडियावरही त्यांनी टीका केली. त्यांनी इंडिया मुजाहीद्दीन म्हणत टीका केली. पंतप्रधान एक-दोन दिवसात महाराष्ट्रात येणार आहेत. गद्दारांसोबत बसणार आहेत. त्यांचा सत्कार करणार आहेत. हेच आपले हिंदुत्व आहे?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा