गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा विहिरीतील गाळ काढताना दोन मजुरांचा मृत्यू

विहिरीतील गाळ काढताना दोन मजुरांचा मृत्यू

लातूर, दि.२४ मे २०२०: वांजरवाडा (ता.जळकोट) येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्यासाठी गेलेले मजूर विहिरीच्या तळाशी बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लातूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र ,डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मारुती बापूराव पवार , परमेश्वर गणपती केंद्रे या दोन कामगारांचा विहिरीतील विषारी वायू व घाण पानाच्या दुर्गंधीमुळे या मजुरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यांच्यासोबत काम करत असलेले जयवंत बाबुराव पवार वय ३४, श्याम मारुती गीर वय ३५ यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्या कुटुंबियाकडून सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हे चारही मजूर वांजरवाडा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक विहिरीचे काम करण्यासाठी २२ मे रोजी वांजरवाडा येथे गेले होते. खोल असलेल्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी हे मजूर विहिरीच्या तळात जाऊन त्या ठिकाणचा विषारी वायू व घाण काढत होते. मात्र त्यांना घाण वास सहन झाला नसावा व त्याठिकाणी ते चक्कर येऊन बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना इतर दोघांनी बाहेर काढले. पुढील तपासणीसाठी उदगीरला पाठवण्यात आले, त्यानंतर उदगीरवरून लातूरच्या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र कोणीही त्यांना घ्यायला तयार नव्हते. स्थानिक नागरिक किरण पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारुती बापूराव पवार यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तर परमेश्वर गणपती केंद्रे यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथेच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुढील उत्तरीय तपासणीसाठी दोघांचे मृतदेह सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version