इंदापूर, ९ ऑक्टोबर २०२०: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आत्मनिर्भर समर्थ इंदापूर तसेच स्टार्टअप इंडिया अंतर्गत आयोजित उद्योजकता विकास ऑनलाईन कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी वरील मत व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये ३२१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. डॉ. उमराणी म्हणाले की, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये झालेल्या मोठ्या बदलामुळे येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये अस्तित्वात असणारे ६० टक्के रोजगार लुप्त होणार असल्याने छोटे व्यवसाय उद्योग क्षेत्राकडे वळणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात अनेक नोकऱ्या देखील कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा. उद्योजकाच्या माध्यमातून आपण आपले साम्राज्य निर्माण करू शकतो. उद्योग व्यवसाय सुरू करताना आर्थिक अभ्यास महत्वाचा आहे. अर्थशास्त्र म्हणजेच आर्थिक गोष्टींचा व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे तरच व्यवसाय उद्योगांमध्ये यशस्वी होता येईल. यासाठी अर्थशास्त्राचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. काटकसर, धोरणीपणा, चिकाटी या वृत्तीमुळे मुलींना उद्योग व्यवसायामध्ये आर्थिक पराक्रमाची मोठी संधी आहे.
डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या की, ‘नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमावर भर देण्यात आलेला आहे. उद्योगात यशस्वी होण्यासाठी केवळ हुशार असून चालत नाही तर व्यावसायिक कौशल्य आत्मसात करून गरजेनुसार उत्पादन निर्मिती आणि विक्री कौशल्य असणे आवश्यक आहे.’
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. संजय चकणे यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अंतर्गत अनेक सुविधा मार्गदर्शन नवउद्योजकांना मिळावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रेरणेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड यांनी या ऑनलाईन कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. कला विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर यांनी आभार मानले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. शिवाजी वीर, प्रा. रामदास ननवरे, डॉ. राजेंद्र भोसले, प्रा. धनंजय भोसले, प्रा. मृदुल कांबळे, प्रा. गौतम यादव, प्रा. संदीप शिंदे यांनी आयोजनात सहभाग घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे











































