गोल पोस्ट इतर राजकारण उद्धव-राज, मनसे-सेना एकत्र येणार का ?

उद्धव-राज, मनसे-सेना एकत्र येणार का ?

मुंबई, २२ ऑगस्ट, २०२२: उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटून आता शिंदे गट बाहेर पडला आहे. त्यानंतर उरलेली तथाकथित शिवसेना आता काय पावलं उचलणार? याकडे सगळ्याचं लक्ष लागले आहे. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चांना ऊत आला आहे.
ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असा आग्रह जनतेतून केला जात आहे. मात्र यावर राज ठाकरे किती उत्साही आहे, हे त्यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे बोलतात एक आणि वागतात दुसऱ्याच प्रकारे. त्यामुळे उद्धव ठाकरे हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाही. असं राज ठाकरे यांनी रोख-ठोकपणे सांगितले होते.

यावर नुकत्याच एका समारंभात राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खास वक्तव्य केलं. त्यात त्यांनी सांगितलं की, एकत्र यायचं की नाही, हा सर्वस्वी ठाकरे बंधूंचा निर्णय आहे. यात माझा काही रोल नाही. मात्र साद घातली तर पाहू, असंही त्यांनी सांगितलं खरं. पण त्याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना शिवसंवाद यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. यावरुन आता दोघांमधला वाद संपला आहे का? किंवा दोघं एकत्र येणार, असं चित्र तयार व्हायला लागलं आहे, असं वाटतंय.

तर दुसरीकडे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगोल्यातल्या सभेत शिंदे गटावर निशाणा साधला. त्यात त्यांनी सांगितलं की राज्यात कधीही मध्यवर्ती निवडणुका होऊ शकतात. तसेच हे सरकार फार काळ टिकणार नाही. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही आमची सेना आहे. असं म्हणत त्यांनी राज आणि उद्धव युतीवर वक्तव्य केलं. ठाकरे बंधूनी एकत्र यावे, यासाठी आम्हीही कायम उत्सुक आहोत. पण या संदर्भातला सर्व निर्णय उदधव ठाकरे स्वत: घेतील, असंही त्यांनी माध्यमांना सांगितलं. यावरुन दोघांमध्ये नक्की काहीतरी शिजतयं असं म्हणायला हरकत नाही.

आता मनसे आणि शिवसेना एकत्र येतील की नाही? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील की नाही? हे आता काळ आणि वेळच ठरवेल हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

error: Content is protected !!
Exit mobile version