पुणे, १७ फेब्रुवरी २०२१: कोविड १९ मुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. परिणामी परीक्षाही घेता आल्या नाही. मात्र नंतरच्या काळात राज्य सरकारने कोविड १९ची स्थिती हाताळत प्रादुर्भाव बऱ्यापैकी रोखण्यात यश मिळवले. त्यामुळे अनेक शाळा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती देखील आता वाढत चालली आहे. एकूणच परिस्थिती पाहता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्रालयाने मोठी घोषणा केलीय. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय.
वेळापत्रकात बदल
१० वी आणि १२ वी च्या ठरलेल्या काळात परीक्षा न घेता त्यामधे बदल करत शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या वेळापत्रक बदलण्यात आला आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी परीक्षा आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र १० वी परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये अनुक्रमे २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ आणि २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.
२१ हजार २८७ शाळा सुरू
नजीकच्या काळात केंद्र सरकारने ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार राज्यात देखील असे वर्ग सुरू करण्यात परवानगी देण्यात आली होती. राज्यात इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून, १८ जानेवारी २०२१ रोजी २१ लाख ६६ हजार ५६ विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत आणि २१ हजार २८७ शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे ७६.८% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे











































