मुंबई, ६ जून २०२१: राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात काल प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. काल दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, तीन महिन्यात काल प्रथमच सर्वात कमी १३ हजार ६५९ कोरोना रुग्णांचे निदान झाले. दि. १० मार्च २०२१ रोजी कालच्या इतकेच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सातत्याने दैनंदिन रुग्ण संख्या वाढत होती. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील १ लाख ८८ हजार ०२७ इतकी झाली आहे.
राज्यात काल ३०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६२ लाख ७१ हजार ४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख १९ हजार २२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे