उत्तर भारतात थंडीचा कहर; कानपुरात २५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, ७ जानेवारी २०२३ : उत्तर भारतात थंडीची लाट आली असून, कानपूरमध्ये सर्वाधिक थंडी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हृदयविकार येण्याचे प्रकार वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसवर पोचले होते. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयांत हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली.

लक्ष्मीपत सिंघानिया हृदयरोग संस्थेचे संचालक डॉ. विनय कृष्णा यांनी सांगितले, की हृदयविकाराच्या समस्या घेऊन ७२३ रुग्ण आले होते. त्यापैकी ४१ रुग्णांना दाखल करून घेतले. रुग्णालयात पोचण्यापूर्वीच १५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचवेळी उपचारादरम्यान ७ रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे उन्नाव रेतीले एकजण, कल्याणपूरचे दोन, तर कन्नौज येथील एकाचा अशा एकूण चौघांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला.

राजस्थानही ६ अंश तापमानाने गारठून गेले आहे. तर शिमला-नैनितालपेक्षा जास्त थंडी दिल्लीत पडत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शुक्रवारी (ता.सहा) तापमान १.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत थंडी हवेमुळे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार शनिवारपासून (ता. सात) डोंगराळ भागात पुन्हा बर्फवृष्टी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील मैदानी भागात तापमानात आणखी घसरण होऊ शकते. त्यामुळे थंडी वाढणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा