लातूरमध्ये होणार ‘वंदे भारत’ची निर्मिती; रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार

लातूर, २ फेब्रुवारी २०२३ : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आणि ‘वंदे भारत मेट्रो’च्या माध्यमातून देशभरात रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. सध्या चेन्नई येथे करण्यात येत असलेली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची निर्मिती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे; तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स आणि पुणे रेल्वेस्थानकांचा अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार असून, रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.

२०२३-२४ चे रेल्वे बजेट बुधवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये रेल्वेसाठी दोन लाख ४१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे‌. देशभरात २०२३-२४ मध्ये सहाशे किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग, दीडशे किलोमीटर रेल्वेमार्गाचे रूपांतरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना या सरकारने बुलेट ट्रेनला विरोध केला होता; परंतु महाराष्ट्रात सत्तापालट झाले असून, बुलेट ट्रेनमधील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे जाळे निर्माण केले जाणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले. महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनसाठी मोठी तरतूद देखील केली आहे. बुलेट ट्रेनचे जाळे निर्माण झाल्यास दळणवळणाची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर