नाशिक, १० जुलै २०२३: आम्ही सरकार मध्ये आहोत, त्यामुळे जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा आम्हाला एक जागा मिळावी. २०१२ पासून आम्ही भाजपसोबत आहोत, माझ्या पाठीमागे देशातील लोक आहे, महाराष्ट्राचा विचार केला तर गावागावात माझ्या कार्यकत्यांचा लोकांशी संपर्क आहे. आरपीआय मधील माझा गट सक्रिय आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
रामदास आठवले नाशिकमध्ये आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी बोलताना सांगितले की, वास्तविक आम्हाला पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळेस संधी मिळायला पाहिजे होती, पण सुरुवातीला छोटं मंत्रिमंडळ करायचे आहे, पुढच्या वेळी तुमचा विचार करु असे मला सांगण्यात आले. त्याला आता वर्ष उलटले आहे. त्यामुळे विस्तार लवकर करा व आम्हाला संधी द्या असे आठवले म्हणाले.
आमच्या सोबत एकनाथ शिंदे आहेतच शिवाय आता अजितदादा आमच्यासोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे. केवळ आता काँग्रेस सोबत येणं बाकी असल्याचे आठवले म्हणाले. आम्ही शरद पवार यांचा आदर करतो, मात्र अजित पवार यांचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे ते म्हणाले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर













































