पुणे, ८ सप्टेंबर २०२३ : कडक उन्हानंतर आता महाराष्ट्रातील जनतेला उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. आता जवळपास महिनाभरानंतर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सुरु झालाय. अशा स्थितीत हवामान खात्याने आता राज्यात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मुंबई आणि पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला आहे. हवामान खात्याने आज कोकण, गोवा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, कालपासून अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने महाराष्ट्रातील मान्सूनबाबत अंदाज वर्तवला आहे.
पुण्यात आज हवामान ढगाळ असेल आणि मध्यंतराने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. एक दोन दिवसात पावसाचा जोर कमी होणार असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. तेथील काही सखल भागात पाणी साचू लागले आहे.
ठाणे परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. दुसरीकडे पालघर जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, आज राज्यभर या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडवर चक्रीवादळाची स्थिती प्रभावी आहे. मान्सून दक्षिणेकडे असून ते इंदूर आणि बैतूलच्या पुढे जात आहे. यासोबतच १९ अंश उत्तरेला कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सोबतच अरबी समुद्रातून येणारे पश्चिमेचे वारेही जोरात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड