नवी दिल्ली, २४ जुलै २०२३ : आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच, भारतातही असाच प्रकार समोर आला आहे. फेसबूकवरून ओळख झालेल्या प्रियकारासाठी भारतातील एक महिला पाकिस्तानात गेली आहे. या महिलेला दोन मुलं असून जयपूरला जाऊन येते असं नवऱ्याला सांगून तिने थेट पाकिस्तान गाठलं आहे. ज्याप्रमाणे पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही तिच्या मुलांसह प्रेमासाठी ग्रेटर नोएडाला पोहोचली. त्याप्रमाणेच राजस्थानच्या भिवडी जिल्ह्यातील एक विवाहित भारतीय महिला, पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात तिच्या सोशल मीडियावरील प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे. महिलेचे नाव अंजू असून तिच्या पतीचं नाव अरविंद आहे. जयपूरला जाते असं सांगून तिने घर सोडलं होतं. परंतु, रविवारी तिने भारतीय सीमा ओलांडली असल्याची माहिती पती अरविंदला प्रसिद्धी माध्यमांद्वारे मिळाली आहे.
अरविंद हा भिवडीत काम करतो तर अंजू एका खाजगी कंपनीत बायोडेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरीला आहे. तिला परदेशात नोकरीसाठी अर्ज करायचा असल्याने तिने २०२० मध्येच पासपोर्ट बनवला होता. अरविंदबरोबर लग्न करण्याकरता तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. या जोडप्याला आता दोन मुले आहेत. अरविंद त्याच्या पत्नी, मुले आणि अंजूच्या भावासह भिवडी येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. अंजू पाकिस्तानात पोहोचल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक अंजूच्या घरी दाखल झालं. पोलिसांनी तिच्या पतीकडे चौकशी केली असता त्याला याबाबतची कल्पना नव्हती. पण अंजू दोन-तीन दिवसांत घरी परतेल, असं त्याचं म्हणणं आहे.
अंजू ही पाकिस्तानातील लाहोरमध्ये राहणाऱ्या तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होती. त्याला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. मात्र ती पाकिस्तानात कशी पोहोचली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, अंजू नावाची भारतीय महिला लाहोरला खैबर पख्तून परिसरात नसरुल्लाह नावाच्या तरुणासोबत राहत असल्याचं पत्र मिळालं आहे. यासंदर्भात महिलेशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसाकडून या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू आहे.
पाकिस्तानात आपल्या प्रियकाराला भेटायला गेलेल्या अंजूने तिचा पती अरविंदसोबत व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क ठेवला होता. ती सध्या लाहोरला असून दोन तीन दिवसांत परत येणार असल्याचं तिने अरविंदला सांगितलं आहे. धक्कदायक म्हणजे आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं अरविंदला माहित आहे. परंतु, ती परत येईल या आशेवर तो आहे. गुरुवारी अंजू जयपूरला जाण्याच्या बहाण्याने तिच्या भिवडी येथील घरातून निघून गेली. त्यानंतर ती तिचा २९ वर्षीय फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे नसरुल्ला आणि अंजू यांची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली, असे Ary न्यूजने वृत्त दिले आहे. तर, आज पाकिस्तानी न्यूज चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, अंजू ३५ वर्षीय असून नसरुल्ला २९ वर्षीय आहे. त्यांची फेसबुकवर मैत्री आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात.
सध्या अंजू मलाकंद जिल्ह्यात असून अप्पर दीर पोलिसांकडून तसेच सुरक्षा पथकाकडून तपास सुरू आहे. तिच्याकडे असलेल्या व्हिसानुसार तिला ३० दिवस पाकिस्तानात राहण्याची परवानगी आहे, तर नसरुल्लाहच्या कुटुंबीयांनी ती पाकिस्तान फिरण्यासाठी येथे आल्याचा दावा केला आहे. एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये सातत्याने तणावाची स्थिती निर्माण होत असताना या दोन देशांतील प्रेमप्रकरणं ही चर्चेचा विषय ठरत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे










































