गोल पोस्ट राष्ट्रीय भारताचा काही भाग नकाशावर दाखविण्याचा प्रस्ताव नेपाळने घेतला मागे

भारताचा काही भाग नकाशावर दाखविण्याचा प्रस्ताव नेपाळने घेतला मागे

नेपाळ, दि. २७ मे २०२०: भारतातील काही भूभाग आपल्या नकाशामध्ये दाखवून तो आपला असण्याचा दावा नेपाळने केला होता. परंतु, त्यानंतर भारत आणि नेपाळ यांच्या मध्ये आलेल्या कुटनितिक संबंधांमधील दरीमुळे नेपाळने एक पाऊल मागे घेतले आहे. खरं तर नेपाळने देशाच्या घटनेत जाहीर केलेला नवीन नकाशा जोडण्यासाठी घटना दुरुस्तीचा प्रस्ताव आज संसदेत मांडायचा होता , परंतू यानिमित्ताने नेपाळ सरकारने घटना दुरुस्तीची कार्यवाही आज संसदेच्या अजेंड्यातून काढून टाकली.

घटनादुरुस्ती विधेयक नेपाळमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांच्या परस्पर संमतीने संसदेच्या अजेंड्यातून काढून टाकले गेले आहे. मंगळवारी नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी नव्या नकाशाच्या मुद्दयावर राष्ट्रीय एकमत होण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी भारताशी वाटाघाटी करून कोणताही प्रश्न सोडवण्याची सूचना केली होती.

भारतासोबत द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी नेपाळने आपल्या वतीने हे पाऊल उचलले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळशी चर्चेसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता. नेपाळने संसदेत नवीन नकाशा सादर न करता मुत्सद्दी परिपक्वतेचे उदाहरण दिले आहेत.

भारताने दिली होती तीव्र प्रतिक्रिया

नेपाळने आपल्या नवीन राजकीय नकाशामध्ये भारतीय प्रदेश दाखविल्याबद्दल भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली. परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळला भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याची सूचना केली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले होते की ‘आम्ही नेपाळ सरकारला असे कृत्रिम व्यंगचित्र प्रकाशित करण्यास टाळावे असे आवाहन केले होते. तसेच भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि क्षेत्रीय अखंडतेचा आदर करा.’ असे ही सांगितले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version