औरंगाबाद, दि.१७ मे २०२०: औरंगाबाद शहरात लॉकडाऊनच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करत आतापर्यंत ६६९ वाहन चालकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आहेत. तसेच त्यांच्याकडून १ लाख ७१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे यांनी दिली आहे.
औरंगाबाद शहरात लॉकडाऊनचे कडक पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून शनिवारीपर्यंत ६६९ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. लॉकडाऊनची कडक अंबलबजावणी सुरू केली आहे. विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. ४८ ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले असून विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.
तसेच अतिसंवेदनशील भागातून अनावश्यक बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः ची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा नागरिकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी:











































