अतिवृष्टीमुळं झालं शेतीचं नुकसान… तरुण शेतकऱ्याची आत्महत्या…

औरंगाबाद, २४ सप्टेंबर २०२०: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस कोसळतोय. त्यामुळं गावोगावी शेतीचं नुकसान झालंय. अनेक शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावलाय. त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यातूनच वैतागून काल एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. औरंगाबाद मधील एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची ही घटना आहे.

अतिवृष्टीमुळं शेतीचं नुकसान झाल्यानं त्यानं आत्महत्या केलीय. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी गावात ही घटना घडली. या घटनेमुळं गावात शोककळा पसरलीय. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षीही राज्यात मुसळधार पाऊस पडला. कांद्यासह इतर अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात कोरोनामुळं देखील शेतकर्‍यांना मोठा फटका बसलाय.

सुरेश रावसाहेब जंजाळ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ३७ वर्षीय तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. या शेतकऱ्यानं अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यानं आत्महत्या केली आहे. काल (२३ सप्टेंबर) दुपारी २ वाजता त्यानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

राज्य आणि केंद्र सरकार दोघांनाही या विषयांमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण एकीकडं कोरोनाचं संकट तर दुसरीकडं अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालंय. अर्थव्यवस्था देखील ढासळलेल्या अवस्थेत आहे. याचा परिणाम शेतीवर देखील होतोय. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा माध्यमांनी व सरकारनं ज्याप्रमाणं उचलून धरला आहे त्याप्रमाणं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न देखील उचलून धरणं गरजेचा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा