मुंबई: विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी मुलगी झाल्यानं तिचा छळ करण्यात येत होता, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र, हे सर्व आरोप साफ खोटे असल्याचं विद्या चव्हाण यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं.
‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेनं आरोप केले आहेत. कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती असं वागत असून न्यायालयात खरंखोटं सिद्ध होईल,’ असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
याबाबतचा संपूर्ण घटनाक्रमच चव्हाण यांनी सांगितला. चव्हाण म्हणाल्या, ‘१० डिसेंबर रोजी माझा मुलगा कामानिमित्तानं डेन्मार्कला कंपनीच्या ट्रेनिंगसाठी जाणार होता. त्याच्या काही दिवस आधी त्याला सुनेच्या मोबाइलवर काही आक्षेपार्ह मेसेज आढळले. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यातून समोर आलं. त्याला धक्का बसला. त्यानं त्याबाबत आम्हाला सांगितलं. नंतर गौरीशी (माझ्या सुनेशी) बोलून वेगळं होण्याचा त्याचा निर्णय सांगितला.
. पुढे त्या म्हणाल्या की, आपल्या सगळ्या गोष्टी उघड झाल्याचं लक्षात येताच तिनं वकिलांचा सल्ला घेतला आणि आरोप सुरू केले. तिनं आमच्याविरोधात ३ कोटींचा दावाही केलाय. अर्थात, ती खोटं बोलते आहे हे यथावकाश समोर येईल. प्रकरण न्यायालयात असल्यानं मी त्यावर अधिक बोलू शकत नाही. खरंतर माझा मुलगा आणि सून दोघेही सज्ञान आहेत. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. पुढं काय करायचं तो त्यांचा निर्णय आहे. नवरा-बायकोच्या वादात मला विनाकारण ओढण्यात आलंय, असंही त्यांनी सांगितलं.’
पुढे त्या म्हणाल्या, गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणं शक्यच नाही. माझ्या दोन्ही सुनांना मी मुलींसारखंच वागवलंय. त्यामुळं मुलासाठी छळ होतोय हे आरोप निराधार आहेत. गौरीला पहिली मुलगी झाली तेव्हाही आम्हाला आनंद झाला होता आणि दुसऱ्या मुलीच्या जन्माचाही आनंदच आहे. वकिलाच्या किंवा अन्य कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती तसं वागतेय.’