जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार, चार जणांचा मृत्यू तर मृतांमध्ये एका पोलिसाचा समावेश

मुंबई, ३१ जुलै २०२३ : जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. पॅसेंजरच्या बी-५ बोगीमध्ये हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याची माहिती कळते. आरोपी कॉन्स्टेबलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या बोरीवली स्थानकात आरोपीची चौकशी सुरु आहे. मात्र गोळीबाराचे कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही पॅसेंजर सध्या मुंबई सेंट्रल स्थानकात पोहचली आहे. पोलीस पथक, रेल्वे पोलीस पथका कडून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ट्रेनची पाहणी करण्यात येत आहे.

एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या आरपीएफचा कॉन्स्टेबल चेतन याने केलेल्या या गोळीबारात, आरपीएफचे एएसआय टीका राम यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्या डब्यात ही घटना घडली, तो डबा पोलिसांकडून सिल करण्यात आला आहे. पोलीस सर्व तपास करत आहेत. गोळीबार का केला, याबाबत तपासाअंतीच स्पष्ट होईल. मृतांची ओळख पटवण्याचेही काम सुरु आहे. मीरा रोड स्थानकात ट्रेन थांबवून मृतदेह उतरवण्यात आले आणि शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत.

कॉन्स्टेबलने हा गोळीबार कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. कॉन्स्टेबलला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजरमध्ये अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांना उतरवत तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा