इंडिया आघाडीची’ ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत बैठक, लोकसभेसाठी विरोधकांची रणनिती ठरणार

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट २०२३ : महाराष्ट्रात आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना पक्षफुटीला आता एक वर्ष झाले आहे. नव्यानेच गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. तसेच महाराष्ट्र काँग्रेस पक्षातही फूट पडणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या चर्चांचे खंडन केले आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता विरोधक सतर्क झाले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. विरोधी पक्षांची नुकतीच काही दिवसांपूर्वी बंगळुरु येथे बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे इंडिया असे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईत होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण ही बैठक मुंबईत नेमकी कधी होईल? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. विशेष म्हणजे या दरम्यानच्या काळात मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर आता इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. मुंबईच्या पवईमधील हॉटेल वेस्टएन्ड येथे बैठक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २५ आणि २६ सप्टेंबरला बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वेळ नसल्याने पुढील तारीख ठरली. महाविकास आघाडीकडे या बैठकीचे संयोजक पद आहे.

इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीमुळे भाजपचे देखील टेन्शन वाढू शकते. कारण आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी प्रभावी अशी रणनीती ठरवली तर त्याचा भाजपला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे या बैठकीकडे भाजपचे देखील लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या गोटात हालचाली सुरु झाल्यानंतर सत्ताधारी पक्षही सतर्क झाले आहेत. सत्ताधारी आमदारांची देखील मुंबईत लवकरच बैठक पार पडणार असल्याची माहिती कळते. या बैठकांमध्ये कोण काय ठरवते ते आगामी काळात विविध घडामोडींमधून स्पष्ट होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा