भारताला विजयासाठी ४ विकेट्सची, तर बांगलादेशला २४१ धावांची गरज

पुणे, १७ डिसेंबर २०२२ : भारत-बांगलादेशदरम्यान चट्टोग्राम मेरे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशच्या सलामीवीरांनी शानदार फलंदाजी करीत उपाहारापर्यंत विकेट न गमावता ११९ धावा केल्या होत्या. कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात बांगलादेशच्या सलामीवीरांनी ११९ धावा केल्या होत्या तेव्हा १७ वर्षांनंतर हे घडले आहे. चौथ्या दिवशी बांगलादेशी फलंदाजांनी झुंजार खेळ करीत भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले. चौथ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी बांगलादेशने ६ बाद २७२ धावा केल्या होत्या. आता उद्या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी ४ विकेट्सची, तर बांगलादेशला २४१ धावांची गरज आहे. सध्या बांगलादेशचा कर्णधार ४० धावा, तर मेहदी हसन मिराज ९ धावा करून नाबाद आहेत. भारताकडून आज चौथ्या दिवशी अक्षर पटेलने ३ विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी सलामीवीर झाकीर हसनने पदार्पणात शतकी खेळी केली. तर त्याला नजमुल हुसैन शंतोने ६३ धावा करून चांगली साथ दिली.

अक्षर पटेनले चौथ्या दिवसाच्या चहापानानंतर बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरवात केली. त्याने मुशफिकूरनंतर लगेचच नरूल हसनला ३ धावांवर बाद करीत आपली ३ री शिकार करीत भारताला सहावे यश मिळवून दिले. अक्षर पटेलने बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकूर रहीमचा २३धावांवर त्रिफळा उडवत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. भारताचा अनुभवी गोलंदाज आर. अश्विनला बांगलादेशच्या दुसऱ्या डावात बराच काळ विकेट मिळाली नव्हती. अखेर त्याने पदार्पणात शतकी खेळी करणाऱ्या झाकीर हुसैनला १०० धावांवर बाद करीत भारताला चौथे यश मिळवून दिले.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी बांगलादेशने १०२ षटकांत ६ बाद २७२ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवशी भारताला बांगलादेशच्या ६ विकेट्स घेण्यात यश आले. अक्षर पटेलने ३, तर उमेश यादव, कुलदीप यादव आणि रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा