गोल पोस्ट राष्ट्रीय केंद्र सरकार ठेवणार कांद्याच्या साठेबाजीवर अंकुश

केंद्र सरकार ठेवणार कांद्याच्या साठेबाजीवर अंकुश

नवी दिल्ली: सध्या बाजारात कांद्याचा तुटवडा आहे. कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याचे हे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने नवी उपायोजना केली आहे. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे कांद्याच्या घाऊक आणि फुटकळ व्यापाऱ्यांना जास्त स्टॉक साठवून ठेवता येणार नाही.असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली.

घाऊक आणि फुटकळ व्यापाऱ्यांसाठी असलेली कांदा साठवण्याची मर्यादा ५० टक्क्यांनी घटवून अनुक्रमे २५ आणि पाच टक्के करण्यात आली आहे.
केंद्रीय ग्राहक विषय, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता सर्व राज्यांमधील कांद्याच्या घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन तर फुटकळ विक्रेत्यांना पाच टनापेक्षा जास्त कांद्याचा स्टॉक ठेवता येणार नाही.

हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. कांद्याची आयात करणाऱ्यांना हा आदेश लागू होणार नाही. यापूर्वी केंद्र सरकारने ३० सप्टेंबरला घाऊक आणि फुटकळ विक्रेत्यांवर कांद्याचा स्टॉक करण्यावर मर्यादा आणल्या होत्या. देशाच्या वेगवेगळया बाजारात कांद्याच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. काही राज्यांमध्ये प्रतिकिलो कांद्याच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version