नवी दिल्ली, ७ जून २०२३: मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचार थांबवावा, अशी मागणी करीत राज्यातील कुकी समाजाच्या महिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवास्थानासमोर आज सकाळपासून निदर्शने केली. अशा संकटाच्या काळात आम्हाला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह वाचवू शकतात, अशा आशयाचे फलक यावेळी दाखविण्यात आले.
हिंदू मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मागणीला कुकी आणि नागा समाजाने विरोध चालविलेला आहे. त्यातून मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ८० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर ३५ हजार लोकांना घरेदारे सोडून सुरक्षित जागी आश्रय घ्यावा लागलेला आहे.
केंद्र सरकारने आश्वासन दिल्यानंतरही कुकी लोकांवर हल्ले होत असल्याची तक्रार निदर्शनात सामील असलेल्या महिलांनी केली. तणाव कमी करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी गेल्याच आठवड्यात अमित शाह यांनी मणिपूरमध्ये चार दिवस तळ ठोकला होता. मात्र त्यानंतरही हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. असं या महिलांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर
