“नटसम्राट” च्या पहिल्या प्रयोगाला झाली ४९ वर्ष

‘कुणी घर देता का घर?’ या अजरामर संवादाची आजही नाट्यरसिकांच्या मनात एक वेगळीच जागा आहे. खरंच मराठीतील एकमेवाद्वितीय नाटक ‘नटसम्राट’ ची भुरळ अलगच आहे. या नाटकाचे रंगभूमीवर इतिहास घडवला.
या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली. पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.आजही ते प्रेक्षकांच्या मनात वेगळ्या स्थानी आहे.
विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतलेले हे नाटक कधी अभिनयाचा अभ्यास करायला शिकवते तर कधी जीवनातील खूप गोष्टी शिकवून जाते. आजच्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर १९७० रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सादर झाला होता.
या नाटकाबद्दल बोलायचे झाले तर नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली.
श्रीराम लागूंनंतर मा.सतीश दुभाषी, मा.उपेंद्र दाते, मा.यशवंत दत्त, मा.चंद्रकांत गोखले, मा.दत्ता भट, मा.मधुसूदन कोल्हटकर, मा.राजा गोसावी, मा.गिरीश देशपांडे मा.नाना पाटेकर, मोहन जोशी यांनी नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर रंगवले आहेत.
या नाटकासाठी शिरवाडकरांना साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला. नटसम्राट गणपतराव बेलवलकर या माणसाची ही शोकात्मिका आहे. एके काळी नट म्हणून रंगभूमी गाजवलेले गणपतराव आपली सर्व मालमत्ता मुलांमध्ये वाटून टाकतात आणि ऐन वार्धक्यात निराधार होतात, हक्काची मुलंही विचारेनाशी होतात.
वृध्दावस्थेतील एकाकीपणा हा या नाटकातील केंद्रवर्ती आशय असला तरी अत्यंत उत्कट वृत्तीच्या संवेदनाक्षम माणसाला भोवतीच्या व्यवहारी जगातले सांकेतिक जगणे जगता येत नाही. कोणीही कोणाचे नसते हा विच्छिन्न करणारा जीवनार्थ या नाटकाला प्राप्त होतो. अत्यंत प्रभावी स्वगते, भावनेला आव्हान करणारी शब्दकळा, आप्पा आणि कावेरी यांची परिणामकारक व्यक्तिचित्रे यांमुळे हे नाटक प्रभावी ठरले. आजही प्रत्येक कलाकाराला हे नाटक एक आव्हान वाटते. हीच या नाटकाची ताकद आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा