सत्रनिहाय परीक्षेकरिता कृती आराखडा तयार: दादाजी भुसे

मुंबई, दि. १२ मे २०२०: राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृति आराखडा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जाहीर केला. कोविड १९ मुळे राज्यातील सर्वाधिक जिल्हे बाधित झाले आहेत. त्यातील बहुतांश जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कृषि विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे.

राज्यातील बहुतेक कृषि महाविद्यालयांची वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या विलगीकरणासाठी अधिग्रहित केली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, त्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासह कृषि व संलग्न विषयातील सम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजित केले गेले आहे.

सत्रनिहाय परिक्षेकरिता कृती आराखडा तयार:

कोरोना संकटात विद्यार्थ्यांची सुरक्षा, स्वास्थ्य आणि सुरक्षित अंतर अबाधित राखण्याच्या दृष्टीने आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमधील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी संचालक शिक्षण समन्वय समितीने सत्रनिहाय परीक्षेकरिता कृती आराखडा तयार केला आहे. अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

यात प्रामुख्याने कृषि पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाव्दारे १०० टक्के गुण देऊन व्दितीय वर्षात प्रवेश देण्यात येणार, तर व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि तंत्र निकेतन (तीन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के मुल्यमापन अंतर्गत गुणांनुसार, तर व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे ५० टक्के गुण आणि ५० टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश दिला जाईल. कृषि तंत्र निकेतनच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर जवळपास ८ ते १५ जूनच्या दरम्यान संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार घेण्यात येईल अशी माहिती कृषिमंत्री भुसे यांनी दिली.

पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश देण्यात येणार आहे. त्याकरिता ५० टक्के गुण चालू सत्राच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित आणि उर्वरित ५० टक्के गुण हे मागील सत्रांचे घोषित निकालांच्या सरासरीवर (सीजीपीए) आधारित देण्यात येतील.

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा (आठव्या सत्रातील) ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने १५ जून २०२० पूर्वी घेण्यात येतील आणि या परीक्षेचा निकाल १५ जुलै पूर्वी जाहीर करण्यात येईल असे भुसे यांनी सांगितले.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आणि संशोधन घटक (शोधनिबंध) हे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सल्ल्याने घेतले जातील. त्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मुल्यमापन. शोधनिबंध सादर करण्याची अंतिम मुदत आता ३१ जुलैपर्यंत असेल.

पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व पाचव्या सत्राची नोंदणी १ ऑगस्ट, सातव्या सत्राची नोंदणी १ जुलै, तर नवीन वर्षाचे प्रथम सत्राचे प्रवेश १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास वरील नियोजनामध्ये काही प्रमाणात फेरबदल होऊ शकतो असे कृषिमंत्री भुसे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा