मुंबई, ३१ ऑगस्ट २०२१: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायाला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात काल ३,७४१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ६९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ६८ हजार ११२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे.
आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५१ हजार ८३४ इतकी आहे. काल ५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तब्बल ४५ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ५१ हजार ८३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत गेल्या २४ तासात ३३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या २४ तासात ३३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,२२,३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ३०५६ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर १५७७ दिवसांवर गेला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे










































