गोल पोस्ट अर्थ रोजगार देशातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग घेणार भरारी, रोजगारही वाढणार

देशातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग घेणार भरारी, रोजगारही वाढणार

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर २०२२ : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या एकूण विक्रीच्या ५०% पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहन (EV) उद्योग देशाच्या प्रगती मध्ये मैलाचा दगड ठरू शकतो.

इंडियन प्रायव्हेट इक्विटी अँड व्हेंचर कॅपिटल असोसिएशन (IVCA) नुसार, देशातील ईव्ही उद्योग २०३० पर्यंत १ कोटी प्रत्यक्ष आणि ५ कोटी अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. कारण सोसायटी ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स (SMEV) च्या मते, २०२२-२३ मध्ये EV ची विक्री २०२१-२२ च्या तुलनेत ८४% वाढून १० लाखांपर्यंत पोहोचू शकते. यामध्ये दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा मोठा वाटा असेल. तसेच इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री दुप्पटहून अधिक ७.५ लाखांपर्यंत होऊ शकते. तर इलेक्ट्रिक कारची विक्री जवळपास दीड पटीने वाढून ४५००० पेक्षा जास्त होऊ शकते.

भारतातील प्रत्येक शहरात इलेक्ट्रिक वाहनांचे शोरूम सुरू होत आहेत. EV मार्केट सातत्याने वाढत आहे. सरकारी धोरणांव्यतिरिक्त, सामान्य लोकांमध्ये वाढती जागरूकता आणि ईव्ही पायाभूत सुविधांचा विस्तार हे त्याचे कारण आहे.

चालू दुसऱ्या सहामाहीत EV विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या सकारात्मकतेचा परिणाम म्हणून आर्थिक वर्षात देशातील ईव्ही उद्योगात १५००० कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाऊ शकते.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

error: Content is protected !!
Exit mobile version