गोल पोस्ट गुन्हा विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक

विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक

ठाणे, दि. १३ जुलै २०२० : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आठ पोलिसांच्या हत्ये प्रकरणातील प्रमुख विकास दुबे याच्या दोन साथीदारांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. अरविंद एलियास गुद्दन त्रिवेदी आणि सुशील कुमार तथा सोनू तिवारी अशी या दोघांची नावं आहेत. एन्काउंटर स्पेशल दया नायक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

विकास दुबे सोबत घडलेली घटना पाहता दोन्ही गुन्हेगारांनी लखनौला जाण्यासाठी साध्या वाहनाने न जाता विमानाने घेऊन जा अशी मागणी केली आहे. त्याचे वकिल अनिल जाधव यांनी अर्जाद्वारे ही मागणी ठाणे न्यायालयात केली आहे. दरम्यान या दोघांना २१ तारखे पर्यत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिलेत. उत्तर प्रदेश पोलीस आरोपींचा ताबा घेण्यासाठी येईपर्यत त्यांना नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

विकास दुबे हा पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. मात्र त्याचे इतर साथीदार हे फरार झाले होते. त्यापैकी दोघेजण हे ठाण्यातील कोलशेत, ढोकाळी परिसरातील एका चाळीत लपले असल्याची माहिती मिळताच नायक यांच्या पथकाने या दोघांना अटक केली. विकास दुबे बाबत घडलेल्या प्रसंगामुळे ते विमानाने कानपुरला नेण्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कानपूर पोलिसांनी सांगितले की, विकास दुबेची पत्नी ऋचा दुबेला देखील अटक केली आहे. या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यासाठी दुबेच्या पत्नीला अटक केली आहे. त्याची मुले लहान असल्यामुळे आईसोबतच त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version