ज्येष्ठ लेखक विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.हरी नरके यांचे निधन

मुंबई, ९ ऑगस्ट २०२३ : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.हरी नरके यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६० व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.साहित्यिक, सामाजिक चळवळीमध्ये त्याचे मोठे योगदान होते. त्याचबरोबर समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच छगन भुजबळ एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीच्या आधारवडाला मुकला आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची व कार्य पद्धतीची अधिक चांगल्या प्रकारे मांडणी करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडवुन आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा १००० पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते.

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले यांची बदनामी-एक सत्यशोधन आणि महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा या दोन पुस्तकांचा त्यात समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा