मुंबई, दि. ३ मे २०२०: राज्यात सर्वत्र लॉक डाउन चालू आहे त्यामुळे जनतेला जीवनावश्यक गोष्टींखेरीज बाहेर पडण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. परंतु तरीही काही नागरिक नियमांना धाब्यावर बसवून बाहेर पडत आहेत. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा महाराष्ट्र पोलिसांनी दिला आहे.
लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी केलेली कारवाई:
राज्यात कलम १८८ नुसार ९१,२१७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अंतर्गत १८,०४८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या १,२५५ वाहनांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या अंतर्गत ५१,७१९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या बाबतीत १५ जणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांना देखील कोरोनाची लागण:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना ५१ पोलीस अधिकारी, ३१० पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यापैकी २३ पोलीस अधिकारी व २६ कर्मचारी कोरोनामुक्त होण्यात यशस्वी झाले आहेत. यात कोरोना बाधित ३ पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी













































