मुंबई, दि. २२ मे २०२०: काल अन्न व औषध विभागाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. या बैठकीतला आढावा त्यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला. यामधून एक चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. राज्यात केवळ काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक राहिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई किंवा इतर ठिकाणी आठ ते दहा दिवसाचा रक्तसाठा शिल्लक राहिला असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यात अवघ्या काही दिवसां पुरताच रक्त साठा शिल्लक राहिला असल्यामुळे जनतेने पुढे येऊन शक्य होईल तेवढे रक्तदान करावे. तसेच रक्तदान शिबिर आयोजित करावेत. रक्तदान शिबिर आयोजन करताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. असे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. खाजगी क्षेत्रातील तसेच सार्वजनिक क्षेत्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. या बैठकीमध्ये याच्या उत्पादन करणाऱ्या उत्पादकांचा देखील आढावा घेण्यात आला. भविष्यात राज्यात व देशात मास्क मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील व त्याचा पुरवठा या उत्पादकांच्या माध्यमातून व्यवस्थित होत राहील असे त्यांनी सांगितले. भविष्यात या गोष्टींची कोणती कमतरता भासेल असे वाटत नाही. तसेच या अत्यावश्यक गोष्टी मेडिकल स्टोअर्स मध्ये सुद्धा उपलब्ध होतील अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी