मुंबई, १ ऑक्टोबर २०२०: काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज उत्तर प्रदेश हाथरस येथे झालेल्या पीडितेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. राहुल गांधी यांना कलम १८८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलिसांतर्फे अडवण्यात आल्यानंतर ते पायी चालत निघाले असता पोलिसांतर्फे त्यांच्यावर धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर या घटनेवर राज्यात तीव्र विरोध केला जात आहे. तसेच अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विटरद्वारे आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी देखील संताप व्यक्त केले आहे. शरद पवार म्हणाले, “उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली जात आहे. आणि कायदा हातात घेतला जातोय.” असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसेच राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे